समाजवादी, डावी विचारसरणी, दलितवाद, ब्राह्मणवाद, लोकशाही, भांडवलशाही... या सर्व विचारधारांचा अभ्यास असलेला पण, नक्की कोणावर विश्वास ठेवावा या पेचात अडकलेल्या आजच्या तरुणाईच्या मनस्थितीचे चित्रण करणाऱ्या 'गेली एकवीस वर्षे' या नाटकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोगाची संधी मिळाली आहे. 'नाटक कंपनी' या प्रायोगिक नाट्यसंस्थेचे हे नाटक असून १८ जून ते चार जुलै दरम्यान इटलीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात या नाटकाचे दोन प्रयोग होणार आहेत.
शंभर नाटकांमधून 'गेली एकवीस वर्षे'ची निवड झाली असून, महोत्सवामध्ये भारतीय भाषेतून सादर होणारे हे एकमेव नाटक आहे. सध्याच्या 'आयडिओलॉजिकल ब्लॉक'मध्ये अडकलेल्या तरुणाचे प्रतिबिंब या नाटकामध्ये दिसून येते. विचारांच्या आणि सामाजिक प्रश्नांच्या भडीमारामुळे तो दबला गेलाय, निराश झालाय, असे हे नाटक मांडते, असे नाटकाचे लेखक धर्मकीर्ती सुमंत यांनी सांगितले.
२००९ मध्ये झालेल्या 'थेस्पो' या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात पुरस्कार पटकवल्यानंतर हे नाटक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर होण्यासाठी तयार झाले आहे. जगभरातील तरुण नाटककरांच्या निमिर्तीला व्यासपीठ देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांची, मतांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण व्हावी यासाठी इटलीमध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो. त्यामुळे या नाटकाच्या तेथील प्रयोगाला विशेष महत्त्व आहे.
आलोक राजवाडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. गंधार संगोरामने संगीत दिले आहे. तसेच, ऋषीकेश नागावकर, सुजय भडकमकर यांनी अनुक्रमे नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, सायली फाटक, विश्वजीत कदम, मनाली बिबीकर, ऋतूराज शिंदे, विक्रम साने, गौतम रेड्डी, अमोल गोखले, सौरभ दफ्तरदार आणि शार्दूल कदम या तरुण कलाकारांनी यामध्ये भूमिका केल्या आहेत. या संपूर्ण टीमला इटलीचा दौरा करायचा असल्याने आथिर्क साह्याची गरज असून, नाट्यरसिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- आलोक राजवाडे- ९०११०६४६६५.
योगेश
योगेश अर्जुन!